13
2014
Nov
|
बंगलोर आश्रम
|
आज देशभरातून अनेक शेतकरी इथे बंगलोर आश्रमात आले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जर देशातील शेतकरी सुखी आणि समृद्ध असतील तर त्या देशातील लोक जरूर सुखी होतील. ज्या देशातील शेतकरी दुखी: असतील तर तो देश सुखी आणि निरोगी असणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखी आणि समाधानी असणे जरुरी आहे. त्याचे २ मार्ग आहेत १. आपली आंतरिक शक्ती आणि स्वाभिमान वाढवणे. यामुळे आपल्या समोर येणाऱ्या सर्व संकटाना तोंड देण्याची क्षमता वाढते. २. आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नीट योजना बनवून नियोजन केले पाहिजे जेणेकरून अडचणी येणार नाहीत. काही गोष्टी आपल्या हातात आहेत तर काही आपल्या नियंत्रणापलीकडच्या आहेत. आपल्या हातात जे आहे त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक सुधारणे आपण करू शकतो. जे आपल्या हातात नाही ते आपण देवावर सोडून दिले पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे कि सर्व काही नीट होईल आणि आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला दिसेल कि तुमची कामे मार्गी लागतील. श्री श्री शेतकर्यांना म्हणाले, आपण या ३ दिवसांच्या शिबिरात विविध विषयांवर चर्चा करू. मला विश्वास आहे कि तुम्हाला यातून लाभ होईल. आणि जर तुम्हाला यातून लाभ झाला तर देशातल्या लाखो लोकांना लाभ होईल. देशातील कितीतरी लोक तुमच्या कष्टामुळे त्यांची कुटुंबे चालवत आहेत. मी जिथे जिथे जातो तिथे लोकांना जेवणापूर्वी एक छोटा मंत्र म्हणावयास सांगतो ‘अन्नदाता सुखी भव’ ( हे अन्न बनवण्यात ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वाना सुखी आणि समृद्ध असू दे). आम्ही लहान असताना माझे वडील जेवणापूर्वी कायम हा मंत्र म्हणायला सांगायचे. ते तर जेवणानंतर सुद्धा हा मंत्र म्हणायला सांगायचे. मी त्यांच्या कडून दुसरा श्लोक कधी ऐकला नाही. ते कायम याच मंत्राला महत्व द्यायचे. जेंव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेंव्हा तुम्ही हे जेवण पुरवणाऱ्या ३ लोकांसाठी प्रार्थना करता. पहिला स्वाभाविकपणे शेतकरी जो जमिनीतून धान्य उगवतो. दुसरा व्यापारी जो हे धान्य आपल्या घरापर्यंत पोहोचवतो. आता तुम्ही विचारलं व्यापारी का? शेतकरी शेती करून धान्य पिकवतो पण जर व्यापाऱ्याने ते बाजारात आणले नाही तर शेतकरी आणि लोक दोघेही संकटात येतील. जे लोक धान्याचा संचय करून त्याची योग्य किंमत देत नाहीत किंवा खूप जास्त किंमत घेऊन लोकांना विकतात ते धान्याचा अपव्यय करतात. तुम्हाला माहित आहे आपल्याकडे मुबलक प्रमाणात धान्य उत्पादन होते पण योग्य पुरवठायंत्रणे अभावी अनेक लोकांना उपाशी झोपावे लागते आणि दुसरीकडे धान्याचा नाश होतो ( साठा करून ठेवल्यामुळे). चुकीच्या कार्यपद्धतीमुळे टोमाटोचे भाव अचानक खूप वाढतात आणि दुसर्या महिन्यात एकदम खाली येतात. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलेले आहे ना ? ज्यांनी हे अनुभवलेले आहे त्यांनी हात वर करा? (श्रोत्यामधून बरेच हात वर जातात) जर व्यापाऱ्यांनी आपले काम नीट केले नाही किंवा ते नाखूष राहिले तर त्याचा भार तुमच्या खांद्यावर येईल. जो नाखूष, रोगी किंवा असमाधानी असेल तोच काहीतरी वाईट करेल. जो नाराज असेल तोच कायदे नियम तोडून अप्रामाणिकपणा करेल. जो माणूस समाधानी असेल तो इतरांना त्रास देण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे जेंव्हा व्यापारी आनंदी असेल तेंव्हा तो सर्व कायदे नियम पाळेल आणि शेतकर्यांना फसवण्याचा, त्रास देण्याचा विचार करणार नाही. आज आपल्या शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. किती जण याच्याशी सहमत आहेत ? ( अनेक लोक हात वर करतात). तुम्हाला माहित आहे भारतात आपण जी साखर तयार करतो त्याची किंमत १२ रुपये किलो आहे. पण आपण ती बाहेच्या देशातून आयात करतो आणि ३० रुपये किलोने विकतो. आपली भारतीय साखर काय बाहेरच्या साखरे पेक्षा कमी गोड आहे? हे असे का होत आहे? काही भ्रष्ट राजकारणी उद्योगपतींशी हातमिळवणी करून अशा बेकायदेशीर गोष्टी करत असतात. त्यामुळे जर व्यापारी नाखूष असतील तर शेतकरी आणि सामान्य लोकांना त्रास होईल. व्यापारी जेंव्हा नाराज असतात तेंव्हा ते धान्यात, साखरेत भेसळ करून जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. जेंव्हा तुम्ही १ किलो धान्य खरेदी करता तेंव्हा त्यात १००-२०० गरम भेसळ, कच, कचरा मिळेल. आजकाल दुध, गव्हाचे पीठ, तूप यात सुद्धा भेसळ होते. जो व्यापारी हे असेले उद्योग करतो तो नक्कीच मनातून नाराज आणि असमाधानी असला पाहिजे. म्हणूनच आपण त्याच्या साठी प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून ते अन्नात भेसळ करणार नाहीत आणि शेतकर्यांना बाजारातला त्यांचा हक्काचा नफा मिळेल. व्यापारी हव्यासी नसावा. त्याने अवाजवी भावात वस्तू विकून नफा कमवू नये. त्याने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या भावापेक्षा आतिशय जास्त भावाने विकू नये. धर्मशास्त्रात लिहिल्या प्रमाणे व्यापाऱ्याने २०% नफा कमवावा, त्यापेक्षा जास्त नव्हे. पण आज व्यापारी स्वार्थासाठी ५०% किंवा जास्त नफा ठेवतात आणि शेतकर्यांना खूपच कमी देतात. हे बरोबर नाही. याउलट जर एखादे धान्य किंवा उत्पादन जर बाजारात जास्त विकले जात असेल तर त्याच्या नफ्याचा योग्य हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. या मंत्राद्वारे ज्या तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करतो तिसरी व्यक्ती म्हणजे घरातील स्त्री, जी अथकपणे जेवण बनवते. जर ती नाखूष असेल तर घरातील इतर लोकांना त्रास होईल. जर घरातील स्त्री आतून नाराज आणि असमाधानी असेल तर ते त्या जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही, आणि ते पचणार नाही. जर ती जेवण बनवताना रडत असेल तर जो माणूस ते जेवण खाणार आहे त्याला सुद्धा अश्रुपासून सुटका नाही. त्यामुळे घरातील स्त्री आनंदी आणि खुश असणे अतिशय जरुरी आहे. यासाठीच आपण ही प्रार्थना करतो. जर तुम्ही बघितले तर खरा अन्नदाता (अन्न देणारा) हा दुसरा कोणी नसून देवच आहे, आणी देव नेहेमी खुश आणि समाधानी असतो. देव कधी नाखूष होतो का? नाही पण तरीही या एकंदर भौतिक व्यवहारी जगात आपण देव, जो अंतिम पालनपोषणकर्ता आहे त्याच्याकडे या अन्न देणाऱ्या तिघांसाठी आपण प्रार्थना करतो. आपण त्यांच्यासाठी रोज जेवणाआधी आणि नंतर प्रार्थना करू. जेवणाआधी आणि नंतर त्यांना आशीर्वाद द्या. भारत हा जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या देशांपैकी एक आहे. इथे इतका पाऊस पडूनही आपण आपल्या पाण्याचे योग्य नियोजन करत नाही. आपण नद्या आणि तलावात रसायने सोडतच आहोत. जगात ज्या रासायनिक खते आणि रसायनांवर बंदी आहे ती आपल्या शेतात आजही वापरली जातात. आपण या रसायनांवर प्रचंड खर्च करतो शिवाय यामुळे जमिनीचा मुळचा कस जातो. यामुळे केवळ पैशांचेच नाही तर आपली जमीन आणि नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान होत आहे. आपण या गोष्टींचा खोलात जाऊन विचार केला पाहिजे. ( श्री श्री शेतकऱ्यांना उदेशून म्हणाले, इथे आश्रमात अनेक तज्ञ आणि शास्त्रज्ञ आले आहेत. ते तुमच्याशी बोलतील, तुम्ही सुद्धा मोकळेपणाने तुमच्या समस्या त्यांच्या समोर मांडा. तुम्ही तुमच्या घरी आला आहात असेच समजा. तुम्ही तुमच्या अध्यात्मिक निवासात आहात. हे तुमचेच घर आहे त्यामुळे खुश राहा आणि इथल्या वास्तव्याचा आनंद घ्या. सकाळी तास, दोन तास थोडा योग, प्राणायाम आणि ध्यान करा. इथे बरेच शिक्षक आहेत जे तुम्हाला शिकवतील, त्यामुळे तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही निरोगी असाल तर देश निरोगी होईल. जर तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल तर तुम्ही जे धान्य पिकवाल त्यामुळे त्यामुळे देशातील जी जनता ते खाईल ते आनंदी आणि निरोगी राहतील.) |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'